राष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन
schedule16 Jun 25
person by
visibility 36
categoryराजकीय घडामोडी
रावजी तारी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी, मालवण, देवगड, कुडाळ, कणकवली तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, मंडणगड, दापोली, खेड येथील तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामार्फत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकरी हा देशाचा कणा असून, सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व बाजारातील मंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करत राहील. असे पत्रकारांशी बोलताना कोकण विभाग अध्यक्ष सुशांत पोवार यांनी सांगितले. यावेळी कोकण महिला आघाडी अध्यक्षा सिमंतिनी मयेकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली पुढाकार घेतला.
निवेदनामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेती करणे नुकसानीचे बनले आहे. अहवालानुसार दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. आज तहसीलदारसो यांच्यामार्फत आम्ही शासनाला कळवीत आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहे याची नोंद शासनाने घ्यावी ,अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल. असे नमूद केले आहे.