बाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
schedule16 Jun 25
person by
visibility 113
categoryमहाराष्ट्र
आकाश भारतीय (विशेष वृत्त) - "नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं. गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं, पिशवीत घातलं आणि एसटीने गावाकडं निघून आलो. कुणी गाडी विचारली नाही, कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही. काहीच नाही..."मृत बाळाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात जोगलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावात सखाराम आणि अविता कवर राहतात. प्रगत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ११ जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेतलंच पाहिजे. वीटभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं. २६ वर्षांच्या अविता गर्भवती होत्या. ११ जूनच्या पहाटे अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारा आहे. आणि तेही मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे-दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील.
पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, पाणीटंचाई अशा समस्यांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात. मात्र, एवढी वर्षं या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येतंय.