राजकपूर पुतळ्यासमोरील रंकाळा गार्डमध्ये मृत माशांचा खच, मासे कुजल्याने परिसरात दुर्गंधी
schedule09 May 25
person by
visibility 65
categoryकोल्हापूर
संजय सुतार (कोल्हापूर शहर वार्ताहर) - कोल्हापूरचा वैभव असलेला रंकाळा तलाव हा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम आता समोर येत असून राजकपूर पुतळा समोरील गार्डन येथील रंकाळा तलावातील हजारो मासे मृत झाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रंकाळा तलावाच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मृत माशांचा खच तलावाच्या काठाशी लागला आहे. तर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रंकाळा तलावाच्या प्रदूषणात आणखी वाढ होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
एरव्ही निवांतपणे बसून रंकाळ्यामागे आकाशात रंगांची उधळण करत मावळतीला जाणार्या सूर्याचा नजारा बघण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील आणि देशातील लाखो पर्यटक रंकाळा परिसरात येत असतात. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेल्या हा रंकाळा कोल्हापूरच्या गळ्यातील वैभव आहे. मात्र, हा वैभव जपून ठेवण्याची देखील महानगरपालिकेला इच्छा नसल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसात रंकाळा तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे हजारो मासे मृत झाले असून रंकाळाच्या काठाला मृत माशांचा खच लागला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रंकाळा तलावात मासे मृत्युमुखी पडत असून प्रशासनाला याचं काहीही देणंघेणं नाही अशा भूमिकेत महापालिका दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मरून पडल्याने आणि उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात असल्याने मासे आता कुजू लागले असून मोठ्या प्रमाणात परीसरात दुर्गंधी होऊ लागली आहे. राजकपूर पुतळा समोरील गार्डन येथील तलावात परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मरून पडलेले दिसत असून परिसरातून जाणाऱ्या लोकांना नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ आली आहे.
अंबाबाईचा आणि ज्योतिबाचे दर्शन घेतलं की पर्यटक आणि कोल्हापूरकर नेहमीच संध्याकाळी रंकाळा तलावाकडे येत असतात. रंकाळा तलावा येथील राजकपूर पुतळा येथील गार्डनमध्ये पर्यटक मावळता सूर्य पाहण्यासाठी गर्दी करतात. सध्या मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने रंकाळा तलावातील पाणी आटले आहे परिणामी संध्यामठ येथील गणेश मंदिर हे आता दिसू लागल्याने पर्यटक तलावात उतरत आहेत तर काल गुरुवार मे महिन्याच्या सुट्ट्या आणि शनिवारी वीकेंड असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे जमा झाले मात्र त्यांना नाकावर रुमाल लावण्याची वेळ ओढावली. मासे कुजत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रंकाळा संवर्धनासाठी आणि सुशोभीकरणासाठी दरवर्षी लाखो करोडो रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून घेण्यात येतो मात्र हा निधी नेमका कोठे जातो हा प्रश्न आता निर्माण होत असून जर निधी मंजूर होऊन देखील रंकाळ्याचे संवर्धन होत नसेल आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे मासे मरून पडत असतील तर नेमक प्रदूषण मंडळ आणि महापालिका प्रशासन करतय तरी काय हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.